Wednesday, 1 October 2025

"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा"

प्रथमतः गदिमा यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. शेटफळे ते पुणे असा जो मराठी भाषेतील आधुनिक वाल्मिकी यांचा प्रवास आहे त्याला शतशः नमन. मीच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्या गदिमांची साहित्यसंपदा वाचून, ऐकून, बघून मराठी भाषेचा आनंद अनुभवतील यात काही शंकाच नाही.


गीतरामायणातील आजचे गाणे आहे. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
"यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ | समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागम: ||" या संस्कृत श्लोकावर आधारित गदिमांनी हे गाणे लिहिले.
या गाण्यात गदिमांनी जे जगण्याचे सार, सूत्र मांडले आहे ते कालातीत सत्य आहे. हे गाणे म्हणजे कोणत्याही दुःखावर हळुवारपणे फुंकर घालून, माणसाला नवीन उमेद, नवीन आशा देणारे आहे. त्याच बरोबरीने माणसाने आपला कर्मयोग कधीही विसरू नये हे देखील सांगते.

दैवजात दुःखें भरतां, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा ।। धृ।।
तसे बघायला गेले तर हे गाणे रामायणातील कथेला पुढे नेण्यासाठी रचलेले आहे. राजा दशरथाच्या निधनानंतर भरत, राम आणि लक्ष्मण यांना ही दुःखद वार्ता देण्यास येतो. त्याचबरोबर आता राज्यकारभार हाती घ्या म्हणून आर्जवे देखील करतो. पण प्रभू श्रीराम आपल्या पित्याला दिलेल्या वचनाशी बांधील असतात.


माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात,
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात,
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।१।।

आयुष्यात प्रत्येक प्रसंगी हा धडा आपण घेतला पाहिजे. माणसांच्या यशात आणि अपयशात बरेच घटक कारणीभूत असतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. मनुष्य हा अशा क्षणी हतबल, असहाय असतो. त्यामुळे अपयश जरी आले तरी स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नसतो. त्यापेक्षा परिस्थितीला स्वीकार कर आणि पुढे जात राहा.
म्हणून प्रभू श्रीराम सांगतात की माता कैकयी, पिता दशरथ यांच्यापैकी कुणालाही दोष देता येणार नाही. हा सगळ्या माझ्या नशिबाचा खेळ आहे. त्यांचा राज्याभिषेक ते १४ वर्षे वनवास या नियतीच्या फेऱ्यात कधी कुठे गणित बिघडले आणि सिंहासनाऐवजी जंगलात राहणे आले.

या पुढच्या दोन्ही अंतऱ्यात गदिमा पूर्ण आयुष्याचे तत्वज्ञान सांगतात. माझ्या दृष्टिकोनातून हे दोन्ही अंतरे म्हणजे कमीत कमी शब्दात सांगितलेले वैश्विक सत्य. जगातील कोणत्याही तत्वज्ञानाची पुस्तके किंवा ग्रंथात जे सांगितले आहे ते गदिमांनी फक्त ६ ओळीत लिहिले आहे. आणि इथेच या ओळी रामायणपुरत्या मर्यादित न राहता त्याच्याही पुढे जाऊन कालातीत होतात.

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत,
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत,
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।२।।

जगातील सगळया संस्कृती कधी ना कधी तरी लयाला गेल्याच. देशांचे उदाहरण घ्या. एकेकाळी समृद्ध असणारा हिंदुस्थान पारतंत्र्यात सापडला. युरोपातील अनेक देश म्हणजे फक्त अवशेष जपून ठेवणारी संग्रहालये झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थावर गोष्टींचा माज करू नकोस. कधी ना कधी तरी या गोष्टी लयाला जाणार आहेतच.

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात,
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत,
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।३।।

आपल्या जीवनाचे रहाटगाडगे देखील जन्म आणि मृत्युच्या या चक्रात फिरत राहते. त्यामुळे स्वप्न बघत रहा. जरी ती पूर्ण झाली नाहीत तरी त्याचा शोक करू नकोस. आपल्या कर्मयोगावर चालत राहा. मरणाच्या पुढे काय आहे हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे जे माहिती नाही त्याची चिंता करू नकोस.

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत,
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात,
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।४।।

पृथ्वीवरील प्रत्येक जण काही ना काहीतरी दुःखातून जातच असतो. त्यामुळे तू एकटाच दुखी आहेस असे समजू नकोस. कुणी दुःख बोलून दाखवतात, कुणी दाखवत नाहीत. प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो.

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?,
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?,
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।५।।

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट,
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ,
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।६।।

या अंतऱ्यात दोन ओंडक्यांचे सुंदर रूपक वापरले आहे. आपल्या सभोवती अशी कितीतरी उदाहरणे असतात.आपण आपल्या आई वडिलांना सोडून दूर देशी येतो, आपली मुले कॉलेज च्या निमित्ताने घराबाहेर पडतात, आपले शेजारी सोडून जातात, मित्र-मैत्रिणी बदलीच्या निमित्ताने, व्हिसाच्या निमित्ताने दुसरीकडे स्थायिक होतात. हे भेटणे आणि एकमेकांपासून दूर जाणे होतंच असते. त्यामुळे जेवढा सहवास आहे तो मस्त आनंदात साजरा करा. 

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस,
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास,
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।७।।

"नको आसू ढाळू आता, पूस लोचनांस," या पहिल्या दोन ओळी बऱ्याच प्रसंगात उपयोगी येतात. प्रेमभंग असो, किंवा एखादी भागीदारी बंद करणार असो, प्रत्येकाचा वेगळा प्रवास आहे. एकमेकांना शुभेच्छा देऊन पुढे मार्गस्थ व्हा.

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ,
पितृवचन पाळून दोघे होउं रे कृतार्थ,
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।८।।

नवव्या अंतऱ्यात गदिमांनी यमक जुळविताना चौदा वर्षे वनवास ही गोष्ट "दशोत्तरी चार" या पद्धतीने वापरली आहे. विशेष म्हणजे "सत्य हे त्रिवार" ही ओळ बाबूजींनी गाण्यात ३ वेळा गायली आहे. इथेच या दोघांचे आपल्या कलेवरील प्रभुत्व सिद्ध होते. बाकी उरलेल्या अंतऱ्यात कथा पुढे सरकत राहते.

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार,
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार,
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।९।।

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत,
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत,
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा,
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ।।१०।।

आयुष्याचे हे सुंदर तत्वज्ञान स्वरबद्ध करताना बाबूजींनी यमन रागाचा वापर केला आहे. त्यांच्या शब्दोचारात पोटफोड्या "ष" आणि शहामृग "श" हे दोन्ही वेगळे ऐकू येतात. हे गाणे गाताना बाबूजींच्या भावना देखील एका क्षणात ऐकणाऱ्याच्या हृदयात जातात.

हे गाणे फक्त गीत रामायणापुरते न राहता आयुष्याचे सूत्र सांगते. कोणतीही खडतर परिस्थिती असो, कोणालाही दोष न देता सारासार विवेक वापरून, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून कर्मयोग करत राहणे म्हणजेच प्रभू श्रीरामाने दाखवलेल्या मार्गावर चालत राहणे.
-- अभिजीत जोशी,
१ ऑक्टोबर २०२५

Tuesday, 30 September 2025

मार ही ताटिका रामचंद्रा


गीतरामायणातील आजचे गाणे हे चक्क एका राक्षसीवर लिहिलेले आहे. ताटिका नावाची ही राक्षसी. महर्षी विश्वामित्रांच्या तपश्चर्येत ती आणि तिचा मुलगा सदैव त्रास देत असतात. म्हणून राजा दशरथाला विनंती करून महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणासह त्यांच्या आश्रमाकडे जात असतात. वाटेत त्यांना ताटिका राक्षसी आडवी येते. 
तिला बघून महर्षी प्रभू रामचंद्राना सांगतात, की हे धनुर्धारी, चाप बाण वापर आणि  ताटिका राक्षसीचा वध करून तिच्या भीतीतून जनतेला मुक्त कर. 
हे गाणे नाट्यशास्त्रातील वीर रसावर आधारित आहे. हे गाणे शौर्य, पराक्रम आणि वीरतेची भावना व्यक्त करते. 

पहिल्याच कडव्यात काही शब्द जे सहसा मराठी भाषेत कमी वापरले जातात जसे की, कार्मुका - धनुष्य धारण करणारा, झणि - पटकन, सायक - बाण.  

जोड झणिं कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका रामचंद्रा ।।१।।

दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या अंतऱ्यात राक्षसीचे वर्णन करताना गदिमांनी वापरलेले शब्द परिणामकारी आहेतच पण बाबूजींनी ते गाताना त्या शब्दांचे उच्चार देखील तितकेच स्पष्ट आणि गाण्याच्या वीर रसाला रसिकांपर्यंत पोचवणारे आहेत. 

दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनीं दर्शनीं ही अभद्रा ।।२।।

तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
करपल्या वल्लरी, करपलीं काननें
अनुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहतां क्रूर मुद्रा ।।३।।

ऐक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
मरुन हस्ती जणूं, भरुन गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी मोड तंद्रा ।।४।।

वरील अंतऱ्यात वापरलेला तंद्रा हा शब्द तंद्री किंवा गुंगी हा अर्थ दर्शवतो. महर्षी विश्वामित्र रामचंद्राला सांगत आहेत की या राक्षसीचा वध कर पण त्या काळातील युद्ध संकेतानुसार स्त्री वर हत्यार उचलणे हे वीरतेचे लक्षण नव्हते. इथे जसा महाभारतात अर्जुन "मम् सीदन्ति गात्राणि" म्हणत  भांबावून गेला होता, तसेच प्रभू रामचंद्रांना देखील प्रश्न पडला होता. पण मग महर्षी विश्वामित्र सांगतात की जे राक्षस राज्यातील प्रजेला त्रास देतात त्यामध्ये राक्षसी देखील असली तरी तो वध राजाला किंवा वीराला क्षम्य असतो. त्याचेच वर्णन हे पाचव्या अंतऱ्यात केले आहे. 

थबकसी कां असा? हाण रे बाण तो
तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
जो जनां सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो मानवेद्रा! ।।५।।

त्याच्या पुढील अंतऱ्यात याच्या आधी कोणी कोणी असे कार्य केले आहे त्याचेही वर्णन महर्षी विश्वामित्र करतात. 

दैत्यकन्या पुरा, ग्रासुं पाहे धरा
देव देवेंद्रही, मारि तें मंथरा
विष्णू धर्मोदधी
शुक्रमाता वधी
स्त्री जरी पारधी, अरि मृगेंद्रा ।।६।।

शेवटच्या अंतऱ्यात, सगळी प्रजा तुझ्या धनुर्विद्येचे कौशल्य बघण्यास उत्सुक आहे, असे सांगत प्रभू रामचंद्रांना शौर्यचंद्र अशी उपमा देतात. 

धांवली लाव घे, कोप अति पावली
धाड नरकीं तिला, चालल्या पावलीं
बघती तव विक्रमां
देव पुरुषोत्तमा
होऊं दे पौर्णिमा, शौर्यचंद्रा ।।७।।

ज्यांना हे मूळ गाणे ऐकायचे असेल त्याची लिंक इथे देतो आहे. वीर रसावर आधारित आणि शंकरा रागात स्वरबद्ध केलेले हे गाणे तुम्हाला देखील नक्की आवडेल. 
मार ही ताटिका रामचंद्रा - https://www.youtube.com/watch?v=UOE17M6D2-U

-- अभिजीत जोशी,
३० सप्टेंबर २०२५ 

Monday, 29 September 2025

मज आणून द्या हो iphone १७ नाथा (विडंबन)

आज खरे तर मी "तोडीतां फुलें मी सहज पाहिला जातां" या गाण्याविषयी लिहणार होतो. प्रभू रामचंद्रांना देखील आपल्या पत्नीचा हट्ट मोडता आला नाही. आपण बिचारे पामर, आपली काय बिशाद?

या विषयी लिहीत असताना आणि काहीतरी नवीनच सुचत गेले. 


पाहता सहज मी ऍपल फोनची गाथा,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा

झळकती तयाची लखलखती स्क्रीन,
किती वेळ वापरून डोळ्यास न येई शीण,
सुमधुर वाजते imusic ची वीण,
वेडीच जाहले air चे वजन बघता,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा

किती नवनवीन त्यातील रंग,
छायाचित्रे देती आधुनिक ढंग,
माझी रूपे बघून तुम्ही व्हाल त्यातच दंग,
कसला विचार करत बसता,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा

बँकेत कोंडिले कष्टाचे जे धन,
या नवीन फोनवर जडले माझे मन,
मजसाठी करा इतका प्रण,
क्रेडिट कार्डच्या बिलाची कसली चिंता,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा

नवीन फोन घेताच पाहतील नणंदा जावा,
वाटेल सहचर मैत्रिणींना माझा हेवा,
आला समीप दसरा, दिवाळी पाडवा,
माझा वाढदिवस कसा विसरता कांता?
मज आणून द्या हो iphone १७ नाथा


विशेष सूचना - हे फक्त काल्पनिक विडंबन काव्य आहे. याचा कोणत्या घटनेशी साधर्म्य असेल तर योगायोग समजावा. :)
This poem is fictional. Any resemblance is purely coincidence.

-- अभिजीत जोशी,
२९ सप्टेंबर २०२५ 

Sunday, 28 September 2025

भय इथले संपत नाही (लघुकथा)



काही आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. काही किरकोळ सामान आणायच्या निमित्ताने भार्गवला किराणा दुकानात जायचे होते. भार्गव आणि त्याचे कुटुंब गाडीतून बाहेर निघाले. थोड्या वेळात तो दुकानापर्यंत पोचला. जास्त काही घ्यायचे नव्हते त्यामुळे कुटुंबीय गाडीत बसले होते. भार्गवने गाडी दुकानाच्या समोर लावली आणि सामान आणायला दुकानात गेला.

दुकानात आत जाण्यासाठी सरकता दरवाजा होता. भार्गव पायऱ्या चढून दुकानाच्या दरवाजासमोर गेला. दरवाजा सरकला आणि तो आत शिरला. तेवढ्यात त्याच्या समोरून एक माणूस दोन मोठी खोकी घेऊन गेला. भार्गवला वाटले की तो माणूस पैसे देऊन बाहेर पडेल. पण तो सरकणाऱ्या दरवाजातून पैसे न देता बाहेर पडला. चिंधीचोर असावा बहुतेक. तिथे काम करणाऱ्या माणसाने त्याला अडवायचा प्रयत्न केला. तिथल्या धक्का-बुक्की मध्ये एकाने बंदूक काढली आणि गोळ्या झाडल्याचा आवाज आला.

भार्गवचे कुटुंबीय गाडीतून हे सर्व बघत होते. त्यांनी भार्गवला आत जाताना बघितले होते. त्यानंतर त्यांनी फक्त बंदुकीचा आवाज ऐकला.

भार्गवची बायको माधवी पॅनिक झाली आणि तिने लगेच पोलिसांना फोन लावला. तिची मनस्थिती अतिशय दोलायमान झाली होती. विहान, त्यांचा मुलगा तर सतत रडत होता. गाडीत ते दोघेही लपून बसले होते. विहानच्या शाळेत असे मॉक ड्रील होत असल्यामुळे त्याला तशी सवय होती. पण शाळेतले प्रसंग काही खरे नसतात. इकडे मात्र हा खरा खुरा प्रसंग होता.

भार्गव माधवीला फोन करत होता पण तिचा फोन व्यस्त होता. दोघांना एकमेकांचे फोन लागत नव्हते. ती भार्गवला फोन करत होती आणि तो माधवीला. अचानक तिला आठवले की जर त्याचा फोन चुकून वाजला तर काहीतरी गडबड होईल. ती गाडीत बसून फक्त देवाचा धावा करत होती.

इकडे भार्गवने दुकानाच्या आत देखील गोळीचा आवाज ऐकला आणि तो लपण्यासाठी पळू लागला. त्याच्या सोबत दुकानात आणखी काही लोक होते. ते पण सैरावैरा पळत होते. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे. गोळ्यांच्या आवाजाचा वेध घेता घेता भार्गव लपत छपत दुकानाच्या मागच्या बाजूला पोचला. दुकानात काम करणारे लोक देखील त्याच्यासोबत होते. बाहेर पडायचे का लपून राहायचे हा विचार चालू होता. तेवढ्यात दुकानात काम करणारा माणूस म्हणाला की बाहेर पडा. हा दुकानाच्या मागचा दरवाजा बऱ्याच लोकांना माहिती नाही. तुम्ही सुरक्षितपणे बाहेर पडा. पळत पळत भार्गव गाडीपर्यंत पोचला. तोपर्यंत पोलीस गाडीचा सायरन ऐकायला मिळाला. आता जरा सगळ्यांनाच धीर आला.

भार्गव पटकन गाडीत बसला आणि स्टार्टर मारून गाडी सुरु केली. त्याला लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचे होते. ३० सेकंदाच्या आत तो त्या परिसराच्या बाहेर पडला देखील. गाडीत नुसती रडारड आणि भीतीचे वातावरण होते. ७-८ किलोमीटर गेल्यानंतर एके ठिकाणी गाडी थांबवली. भार्गव , माधवी आणि विहान या तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. ते अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. विहानची रडारड चालूच होती.

भार्गवने त्यांना सांगितले की आता काळजीचे कारण नाही. आपण सगळे एकत्र आहोत. एकमेकांसोबत आहोत. २० मिनिटापूर्वी जे काही झाले ते एक वाईट स्वप्न होते असे समजा. सगळेजण शांत झाल्यावर त्याने गाडी सुरु केली आणि पुढील प्रवासाला लागले.

भार्गवने अशा घटनांबद्दल ऐकले होते पण प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदा आला. दुकानात गोळ्या बिस्कीट विकत घ्यावे तसे इकडे बंदुका मिळतात. आई वडील मुलांच्या १७-१८ व्या वाढदिवसाला भेट म्हणून देतात. इथल्या मुलांना काय मोठ्या माणसांना देखील सारासार विचार करायची वृत्ती नाही.

त्याच्या मनात कितीतरी वेळ हाच विचार चालू होता की आज काहीही होऊ शकले असते. देवाची कृपा आणि वाडवडिलांची पुण्याई यांच्या जोरावर आपण सर्व कठीण प्रसंगातून बाहेर पडलो.

"घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे" या गाण्याचा ओळी त्याला गाडी चालवताना आठवत होत्या.

एकंदरीतच अमेरिकेत राहताना त्याला सतत वाटत होते, "भय इथले संपत नाही...!!" आणि आता पुढे काय करायचे या विचारात त्यांनी पुढचा प्रवास सुरु केला.
---------------------------------------------------------------------
या नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांच्या मनातील भीती दूर होवो, संपूर्ण जगात शांतता नांदो एवढीच त्या दुर्गादेवी कडे प्रार्थना.
-- अभिजीत जोशी,२८ सप्टेंबर २०२५

Saturday, 27 September 2025

स्वयंवर झाले सीतेचे

 ब्लॉग ६ - स्वयंवर झाले सीतेचे


"सीता स्वयंवर" हा बहुतेक सर्व लेखकांसाठी, नाटकांसाठी अत्यंत आवडता विषय. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी याच विषयावर आधारित नाटकाने मराठी नाट्यसृष्टीची सुरुवात केली होती. हा विषयच एवढा नाट्यपूर्ण आहे. राजा जनकाचे शंकराने दिलेले धनुष्य, त्याने सीतेच्या स्वयंवरासाठी ठेवलेली अट आणि शेवटी राम सीतेचे लग्न. या प्रत्येक प्रसंगात नाट्यमयता भरलेली आहे. 

गदिमांनी देखील या काव्यात ते नाट्य पूर्णपणे उतरवले आहे. १० अंतरे असलेल्या या गाण्यात गदिमा, पूर्ण कथा त्यातील छोट्या छोट्या बारकाव्यांसकट आपल्यासमोर उभी करतात जणू काही ते स्वत: त्या प्रसंगी उपस्थित आहेत. सीता माता ही धरणाची कन्या म्हणून देखील ओळखली जाते. तर प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार. म्हणूनच पहिल्याच ओळीत गदिमा लिहितात, 

"आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें , स्वयंवर झालें सीतेचे"

इथून पुढे सगळी गोष्ट काव्य स्वरूपात येते. मराठी भाषेत असलेले समानार्थी शब्द या पूर्ण काव्यात आपल्याला दिसतील. राजा, नृप, कन्या, दुहिता असे शब्द तर आहेतच पण सीतेला ज्या काही नावांनी ओळखले जाते ती देखील इथे वापरली आहेत. जसे की, जानकी, मैथिली, भूमिकन्या,रामांगी इत्यादी. 

"मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी,
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी,
फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेचे,
स्वयंवर झालें सीतेचे"

हा अंतरा म्हणजे ४ ओळीत लिहिलेली हळू हळू फुलत जाणारी प्रेमकथा. सीता स्वतः स्वयंवराच्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रभू श्रीरामांकडे ती बघतच राहते. प्रभू रामचंद्रांनी पिनाक धनुष्य उचलताच सीतेच्या मनात आनंद उत्पन्न होतो. "फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेचे"  या ओळीत वापरलेला अनुप्रास/शब्द श्लेष अलंकारामुळे गाण्यात आणखीनच गंमत येते. 

"अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे,
मुक्त हासता, भूमिकन्या मनोमनी लाजे,
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे
स्वयंवर झालें सीतेचे"

"तृप्त जाहले सचिंत लोचन" या ओळीत गदिमांनी वधुपित्याच्या मनाची अवस्था सांगितली आहे. सचिंत या शब्दाचे तसे दोन अर्थ होतात. मनाला चिंता असणे आणि आनंदाने डोळे पाणवणे. एकाच शब्दात किती खोल अर्थ दडला आहे याचे उत्तम उदाहरण इथे दिसते. 

"पित्राज्ञेने उठे हळू ती मंत्रमुग्ध बाला,
अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातीची माला,
गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे, 
स्वयंवर झालें सीतेचे"

"अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातीची माला" या ओळीत अधीर या शब्दाचा केलेला अनुप्रास अलंकार म्हणजे गदिमांच्या प्रतिभेला साष्टांग नमस्कार आहे. नववधूच्या मनातील अधीरता आणि वरमाला घालताना सौख्याचे मंदिर म्हणजेच सुखी संसाराची स्वप्ने इथे उमटली आहेत. 

"अंश विष्णूचा राम, धरेची दुहिता ती सीता,
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता,
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे,
स्वयंवर झालें सीतेचे"

या शेवटच्या अंतऱ्यात गदिमांनी आणि बाबूजींनी कमाल केली आहे. तुम्ही जर गाणे नीट ऐकले तर पहिल्यांदा बाबूजी "आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे " असे गातात तर दुसऱ्यांदा गाताना "आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे" असे शब्द वापरतात. ऐकताना त्यात गंमत येते आणि आता लग्न झाले आहे ही गोष्ट स्पष्ट अधोरेखित होते.

तुम्हाला हे गाणे ऐकल्यावर काय वाटते? 

-- अभिजीत जोशी,
२७ सप्टेंबर २०२५

Friday, 26 September 2025

देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव


देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव,
दिशाहीन पांथस्था, उद्या कोणता गाव?

मनाला वाटे ही कोणती परीक्षा,
अनुभवातून उमजून घे तू दीक्षा,
आयुष्याच्या अडचणींचा कुठे असतो सराव?
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।१।।

कधी कातळाचा कठीण चढ, कधी झऱ्याचा उतार, 
कधी रणरणते ऊन, कधी सावली ती गार,
चल पुढे सतत ठेवुनी मनी भक्तिभाव,
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।२।।

प्रयत्नांना मिळेल योग्य दिशेचा आधार, 
यश येई सामोरे, सर्व स्वप्ने साकार,
जिंकशील तू आयुष्याचा डाव,
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।३।।

कळेल तुला या प्रवासातील गंमत, 
दुःखाशिवाय असे का सुखाला किंमत?
ध्येय प्रवास थोर हे सत्य त्रिवार,
दैवाचे देणे आहे अपरंपार,
नको देऊ थारा, शंकेला वाव,
देवाजीच्या मनाचा न कळे कोणा ठाव ।।४।।

-- अभिजीत जोशी,
२६ सप्टेंबर २०२५

Thursday, 25 September 2025

Barber or Surgeon? - केशकर्तनकार की शल्य विशारद?

प्रसंग १-  काही वर्षांपूर्वी मी माझ्या एका शल्य-विशारद (Doctor of Surgery / Surgeon) मित्राच्या घरी गेलो होतो. सोबत माझा ४ वर्षांचा मुलगा देखील सोबत होता. माझ्या मित्राने त्याची सगळी हत्यारे स्वच्छ करून ठेवली होती. त्यात डॉक्टरांच्या कात्र्या, सुऱ्या आणि बाकीची उपकरणे होती. माझ्या मुलाने पटकन त्याला विचारले. "काका, मी एक प्रश्न विचारू का?" माझा मित्र म्हणाला, "विचार की?". काका, तुम्ही केस कापता का? (Are you a barber?)


त्याचा हा प्रश्न ऐकताच मी जागच्या जागी उडालो. मी मुलाला विचारले, "अरे तुला कशावरून वाटले? तर तो म्हणाला, " अरे बाबा, याची सगळी हत्यारे मला केस कापायच्या दुकानात पण दिसतात. म्ह्णून मी हा प्रश्न विचारला. माझा मित्राने देखील हा प्रसंग विशेष मनावर घेतला नाही. उलट मस्करीच्या वाटेने जात त्याने माझ्या मुलाला विचारले. " अरे हो, तुझे केस कापायचे आहेत का? मी लगेच कापून देतो." माझा मुलगा पटकन नाही म्हणाला. 
त्यानंतर खूप दिवस आम्ही या प्रसंगावरून बरीच थट्टा मस्करी केली. 

प्रसंग २ - यावर्षी जून महिन्यात आम्ही एडीनबर्ग (Edinburgh, Scotland) ला गेलो होतो. तिथे रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (Royal College of Surgeons) हे शल्य-विशारद या विषयाशी संबंधित शिक्षणाचे काम करते. हे महाविद्यालय जगातील पहिल्या मोजक्या शल्य-विशारद या वैद्यकीय शाखेशी संबंधित आहे. इसवी सन १५०५ मध्ये याची स्थापना झाली. तेव्हापासून अगदी आजही इथे शल्य विशारद अभ्यासक्रमाचे धडे दिले जातात. जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये याचा समावेश होतो. माझ्या मित्राला इथे मानद FRCS ही पदवी मिळणार होती. आम्ही सगळे इथे त्यासाठी एकत्र आलो होतो. 

इथे एक शल्य-विशारद या संकल्पनेला अनुसरून छान संग्रहालय बनवले आहे. यात वैद्यकीय क्षेत्रात कसे बदल होत गेले त्याचा पूर्ण इतिहास मांडला आहे. आम्ही ते संग्रहालय बघत होतो. आयुर्वेदातील सुश्रुत संहितेचा देखील इथे उल्लेख केला होता. सुश्रुत मुनींनी कशा प्रकारे शरीराचे अवयव त्या काळी जोडले होते याची माहिती होती. इजिप्त मधील लोकांचे देखील वैद्यकीय ज्ञान किती प्रगत होते हे देखील इथे नमूद केले होते. एका दालनात सर्व आयुर्वेदिक वनस्पती आणि औषधांचा समावेश होता. हे संग्रहालय तब्बल ५ मजली आहे. Edinburgh गेलात तर एक वेगळा अनुभव म्हणून हे संग्रहालय नक्की बघा. 

तर मूळ विषयाकडे आपले थोडे दुर्लक्ष झाले. केशकर्तनकार की शल्य विशारद? (Barber or Surgeon?) असो. इथे एक उल्लेखनीय गोष्ट अशी समजली की, १५ व्या शतकापासून अगदी १७ व्या शतकापर्यन्त इंग्लंड आणि स्कॉटलंड मध्ये न्हावी आणि शल्य-विशारद यांना एकाच श्रेणी मध्ये समावेश होता. बऱ्याच वेळा युद्धांमध्ये न्हावी, प्रथमोपचार करणे, हाडे जोडणे वैगरे गोष्टी करत होते. किंबहुना आजकाल जी सर्जन्स ची हत्यारांची पेटी सुद्धा न्हाव्याच्या धोपटी वरून प्रेरणा घेऊन बनवली आहे. हा उल्लेख इथे अगदी संग्रहालयाच्या सुरवातीलाच लिहिला आहे. ही माहिती वाचताच आम्ही सगळे अवाक झालो. माझा मुलगा पण सोबत होता. ही माहिती वाचताच आम्हाला पहिल्या प्रसंगाची आठवण झाली. मी मुलाला म्हणालो, " अरे तुझे निरीक्षण खरे होते. आम्हाला त्यात मस्करी वाटली होती." माझा मुलगा शांत पणे म्हणाला, " बाबा, त्यात विशेष काय आहे? मला जे दिसले, ते मी विचारले."

कधी कधी मुलांचा निरागसपणा एकदम महत्वाचं काहीतरी शिकवतो. विशेषतः शिक्षणाने एक प्रकारची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधली जाते. त्या पट्टीला मागे सारून बघितले तर बऱ्याचश्या गोष्टी पटकन लक्षात येतात. 

Cognitive bias can create blind spot. It’s a reminder that wisdom isn’t just about accumulating knowledge—it’s also about knowing when to question it.

तुम्हाला काय वाटते?

-- अभिजीत जोशी,
२५ सप्टेंबर २५