ब्लॉग # ८
ही कविता सर्व स्त्री शक्तीसाठी... आपल्या लहानपणापासून आपण बघत आलो आहोत, घरी आजी, आई, बायको, काकू, मावशी,आत्या वैगरे किती कष्ट करतात. त्या सदैव आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी झटत असतात. आजकालच्या युगात स्त्रिया आपल्या पायावर उभ्या असल्या तरी काही दशकांपूर्वी तशी स्थिती नव्हती. बऱ्याच वेळी त्यांना आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागत होती.
स्त्रीला देखील तिचे मुक्त आकाश आहे, तिचे स्वतंत्र विचार आहेत, तिची वेगळी ओळख आहे. स्वकर्तुत्वाने वेगळे जग निर्माण करण्याची हिम्मत तिच्यात असतेच. गरज असते स्वत:ला ओळखण्याची आणि संधीची.
मिळो विसाव्याचा क्षण, कर थोडे आत्मचिंतन,
हातातील वाळूचे कण, बघता बघता जातील निघून,
मिळालेल्या क्षणांना भरभरून जगून घे,
जग थोडीशी स्वत:साठी, वाट जरा बदलून घे ।।१।।
कशाला उद्याची भ्रांत, कशाला कालची टोचणी,
आताच्या या क्षणांत, कर आनंदाची वेचणी,
जय पराजयाची चिंता, दैवावर सोडून दे,
मिळालेल्या क्षणांना भरभरून जगून घे
जग थोडीशी स्वत:साठी, वाट जरा बदलून घे ।।२।।
थकलेल्या शरीरांना, मायेची उब दे,
भरून आलेल्या डोळ्यांना, मोकळी वाट दे,
साचलेल्या जाणिवांना, उडण्याचे पंख दे,
उरतील अभिव्यक्तीला, फुलण्याचे बळ दे,
मिळालेल्या क्षणांना भरभरून जगून घे
जग थोडीशी स्वत:साठी, वाट जरा बदलून घे ।।३।।
-- अभिजीत जोशी
१० ऑक्टोबर २०२४
No comments:
Post a Comment