Friday, 11 October 2024

ती येते, आणिक जाते...

 ब्लॉग # ९

ती येते, आणिक जाते...

आज स्वयंपाक काय करावा हा बऱ्याच जणांना किंवा जणींना पडणारा रोजचा प्रश्न. 

रोज काय नवीन लिहावे? हे मला पडलेले एक कोडेच आहे. त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे. कधी कधी नुसतेच काहीबाही लिहीत बसतो. कधी कधी तर कित्येक तास, कित्येक दिवस काही सुचत नाही. यंत्राप्रमाणे माणसाला देखील Down Time असतो. बऱ्याच लेखकांनी, कवींनी या विषयवार खूप काही लिहिले आहे. 

कवी आरती प्रभू एका कवितेत लिहितात, "ती येते, आणिक जाते, येताना कधी कळ्या आणिते, आणि जाताना फुले मागते." (The idea appears and leaves in a flash)

Creativity does not understand the timeline. As a Writer, you must catch the flow of writing. Even a single thought of distraction can derail the entire process.

तुम्हाला कोणत्यावेळी काय सुचेल ते सांगणे अवघड आहे. आर्किमिडीजला बरं का, अंघोळ करताना घनतेचा सिद्धांत आठवला आणि तो तसाच उघडा धावत सुटला. हा विचार त्याला अभ्यासाच्या खोलीत कधी का बरे आला नाही ? 

असाच एखादा विचार सुचला तरी त्या क्षणी कागदावर उतरवणे हे देखील मोठे कष्टाचे काम आहे. कागदाचा चिटोरा, मोबाईल मध्ये draft केलेली note, बसच्या तिकिटाच्या मागे असलेली मोकळी जागा, पत्राच्या पाकिटाची मागची बाजू...अशी कोणतीही गोष्ट त्यावेळी उपयोगी पडते. त्या क्षणाला ओळखणे आणि त्याचा सदुपयोग करून प्रत्यक्षात उतरवणे हे अतिशय अवघड काम.  एकदा का तो विचार मनातून गेला की त्याचे पुढे काहीच होत नाही. तो तसाच कुठेतरी हरवून जातो. 

या सगळ्यांचा अनुभव सांगणारी ही पुढची कविता. 

मनातील भावनांना, शब्दावाटे उतरावे,

ओथंबल्या संवेदनांनी, हलकेच रिते व्हावे ।।१।।

कधी आटतील शब्द, मनी विचारांचे काहूर,

वणवण फिरशील तू, तहानलेला चकोर,

अधिक उणे, का बरे व्हावे, 

अस्वस्थ मनाने, कसे निजावे? ।।२।।

सुचतील शब्द, अचानक मध्यरात्री,

उठवतील तुला, त्या ओलेत्या गात्री,

सतर्क राहून, वेचून घे, 

शब्द शब्द टिपून घे ।।३।।

क्षण हे उत्स्फूर्ततेचे, संचित प्रतिभेचे, 

देणे ईश्वराचे, जाणून घे

अजाणता होई उशीर, शब्द जाती निघून,

कधी येतील परतून, शाश्वती नाही.. ।।४।।

-- अभिजीत जोशी,

११ ऑक्टोबर २०२४

No comments:

Post a Comment